Friday, October 22, 2010

शहाबुद्दिनच्या (अस्तंगत) साम्राज्यात

समाजानं पिचलेपणाचा तळ गाठला की त्यावर दहशतीचा कळस चढवायला मोहम्मद शहाबुद्दिन सारखे बेबंद बाहुबली निर्माण होत असणार.

घराबाहेर रस्त्यांवर दिवसाढवळ्या-रात्री-२४ तास जेव्हा AK-47 घेऊन कोणत्याही क्षणी गोळ्या घालून मारण्याचं लायसन्स घेऊन गुंड फ़िरत असतील तर काय करायचं?

केवळ गाडीला ओव्हरटेक केला म्हणून गाडीबाहेर काढून गोळ्यांनी शरीराची चाळण केली जात असेल तर काय प्रतिकार करायचा?

गुंडाला पोलिस अटक करायला आले म्हणून भर रस्त्यात पोलिस अधिक्षकाच्या च्या कानाखाली वाजवली जात असेल आणि पोलिसांवर AK-47 ने हल्ला केला जात असेल तर संरक्षण कोणाकडे मागायचं?

न्याय मागायला जर पोलिसांनाच जर बाहुबलीच्या न्यायदरबारातजावं लागत असेल तर दाद कोणाकडे मागायची?

स्वत:चं अपहरण होऊ नये म्हणून अगोदरच जर खंडणी द्यावी लागत असेल तर लपून कुठं रहायचं?भर रस्त्यात कपडे फ़ाडून, निर्वस्त्र करून आणि अंगावर घाण टाकून बेईज्जत केलं जात असेल तर कुठं पळून जायचं?

आणि हे करणारा जर निवडून आलेला लोकप्रतिनिधी असेल तर लोकशाहीचा अर्थ काय?

इथं लोकशाही नसते. हे असतं हुकुमशहाचं साम्राज्य. बाहुबलीची बेलगाम सत्ता. मोहम्मद शहाबुद्दिनचं सिवान. उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेला उत्तर-पूर्व बिहारचा जिल्हा, सिवान. भारतातला सर्वात कुप्रसिद्ध गुन्हेगार राजकारणी मोहम्मद शहाबुद्दिनचं सिवान.

शहाबुद्दिन गेल्या काही वर्षांपासून तुरूंगात आहे. पण त्याची रक्तरंजित दहशत सिवानच्या लोकांनी पंधरा वर्षांहूनही जास्त काळ भोगली आहे, जगली आहे. स्वतंत्र भारतात लोकशाही आणि स्वातंत्र्याचा त्यांच्यापेक्षा जास्त महत्व कोणीही समजू शकणार नाही. आज जरी इथं मुक्त श्वास आहे.

ते काय आहे हे पहायचं होतं.

पाटण्याचा बकाल रस्ता गंगेवरचा हाजीपूर पूल ओलांडला की कधी हिरव्यागार प्रदेशात शिरतो समजत नाही. पण जाणीव होते तेव्हा कर्कश बिहार शांत झालेला असतो. हाजीपूर नंतर दोन्ही बाजूला अनेक किलोमीटर केळीच्या बागा आणि कोबीची शेती लागते. छाप-यानंतर फ़क्त ऊसच ऊस असतो. मध्येच बांधाबांधावर उभी असलेली माडाची उंच झाडं एका रांगेत असतात. जसजसं सिवान जवळ येत जात तसं दोन्ही बाजूला नजर जाईपर्यंत हिरवीगार भाताची शेती असते. मधून जाणारा संथ रस्ता जेव्हा सिवान मध्ये शिरतो तेव्हा हे शहरही शांतपणे पहुडलेलं वाटतं. पण आत खूप खदखदत असणार. हिरव्यागार रंगात न दिसणारा लाल रंगही आहे.

सिवानला येण्याअगोदर या शहाबुद्दिन नावाच्या प्रतापी महापुरूषाबद्दल खूप काही ऎकलं होतं, वाचलं होतं. पण इथं आल्यावर लोकांच्या तोंडून एकापाठोपाठ सुरस कथा ऎकायला लागलात की कानावर विश्वास बसत नाही. हे खरंच असं प्रत्यक्षात होत? फ़ार काही नाही तर फ़क्त पाचच वर्षांपूर्वीपर्यंत? त्या एकतर मिथुन, धर्मेंद्र वा अतिरंजित बी-ग्रेड हिंदी सिनेमांच्या पटकथा वाटतात नाहीतर मग शूल’, ’गंगाजल’, ’अपहरणहे बिहारच्या राजकीय गुन्हेगारीवर आलेले वास्तववादी चित्रपटही फ़िके वाटायला लागतात.


 "आप जहां पर खडे हो ना, बस जरा पिछे मूड कर देखो." ’दैनिक जागरणच्या ऒफ़िसबाहेर त्यांचे ब्यूरो चिफ़ राकेश कुमार बोलता बोलता मला सांगतात.

मी मागे वळून पाहतो. एक लाल काव मारलेली जुन्या घराची भिंत असते.


"क्या उसमे छोटे छोटे होल्स दिखाई दे रहें है आपको?" ते विचारतात


"हां. दिख तो रहे है. क्या है?" माझा भोळा प्रश्न.


"शायद २००४ की बात है...इसी घर के मालिक थे रघुविर शरण वर्मा...अधिवक्ता थे...शहाबुद्दिन के खिलाफ़ किसी केस मे गवाही देने जा रहे थे...सुबह घ्रर के बैठे थे तो यही पे AK-47 से गोलीयां दाग दी...उनकी लडकी बिच मे पड गयी तो उसे भी जान से मार दिया गया..." कुमारांनी शांतपणे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

मी सुन्न झालो. दोन मिनीटं काय बोलावं सुचलच नाही. काय आणि कसं रिएक्ट व्हायचं? जालियनवाला बागेच्या भिंतीकडे जसं बघायचं असतं तसं बघत राहिलो त्या भिंतीकडे. हे असलं रोज घडायचं. १९९० नंतर २००५ पर्यंत.

सिवानच्या मार्केट रोडवरून सरळ पुढे गेलं गोपालगंजच्या दिशेला की होला नदीचा पूल ओलांडला की एक चौक येतो, ’डॊ.आंबेडकर चौक’. तिथे आंबेडकरांचा पुतळाही आहे बाजूला. पण आता या चौकाला चंद्रशेखर चौकम्हणून ओळखलं जातं. मध्यभागी मोठा पुतळाही आहे चंद्रशेखर प्रसादचा. कोण आहे हा चंद्रशेखर प्रसाद?

चंद्रशेखर मागासवर्गीय कुशवाहा समाजातून आलेला हा सिवानच्या एका शहिद सैनिकाचा मुलगा. पुण्याच्या एन डि ए मध्ये मिळालेला प्रवेश सोडून दिल्लीच्या जे एन यू मध्ये गेला कारण कार्यकर्ता व्हायचं होतं, पूर्ण वेळ जमीनदारांविरूद्धच्या चळवळीत पडायचं होतं. तसं त्यानं काम सुरुही केलं. सिवान आणि आसपासच्या भागात राजकीय दृष्ट्या सक्रीय असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)’ म्हणजेच मालेचा स्टुडंट्स विंगचा तो सक्रीय कार्यकर्ता होता. लालूंची राष्ट्रीय जनता दल’ (अगोदरची जनता दल), ज्यातर्फ़े शहाबुद्दिन ४ वेळा सिवानचा खासदार होता, त्यांचा मालेशी उघड उघड संघर्ष होता. शिवाय त्यांची चळवळ उच्चवर्गीय जमीनदारांनासुद्धा डोकेदुखी झाली होती. १९९० ते १९९६, ज्या काळात लालूंचं सरकार होतं त्याकाळात मालेचे ७० कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. ३१ मार्च १९९७ ला मालेनं जिल्हा बंद पुकारला होता आणि सकाळी चंद्रशेखर याच चौकात एक सभा घेत होता. सभा सुरू असतांनाच AK-47 घेतलेले काही गुंड गाड्यांतून आले आणि चंद्रशेखरच्या दिशेने फ़ायरिंग सुरु केलं. चंद्रशेखर आणि त्याच्या अजून एका सहका-याच्या शरीराची अक्षरश: चाळण उडाली. आरोप हा आहे की शहाबुद्दिननेच ही हत्या घडवून आणली.

या चौकातल्या चंद्रशेखरच्या पुतळ्यकडे पाहत असतांना पुन्हा एकदा जालियानवाला बाग आठवली. मी सुन्न उभा.

या अशा कथा इथल्या चौकाचौकात, रस्त्यारस्त्यावर, नाक्यानाक्यावर आहेत. पण कोणीच काही बोललं नाही, फ़क्त सहन करत राहिले जेव्हापासून शहाबुद्दिन राजसुरु झालं १९९० साली. तसा ८० च्या दशकात तो फ़क्त एक गुंड होता या भागातला पण दहशतीच्या बळावर १९९० मध्ये जेव्हा तो पहिल्यांदा अपक्ष म्हणून जेरादेही’ ( हे भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसादांचं गाव) मधून विधानसभेत आमदार झाला तेव्हा त्याला राजकीय सत्तेची चटक लागली. त्याची कर्तबगारीआणि उज्वल भविष्यतेव्हा मुख्यमंत्री झालेल्या लालूंनी तात्काळ हेरलं आणि त्याला आपल्या पक्षात ओढलं. ’शब्बू AK-47' ला राजश्रय मिळाला आणि सरकारदरबारी तो वाल्याचा वाल्मिकीझाला. १९९६ लालूंनी त्याला दिल्ली दाखविली आणि तेव्हापासून तो ४ वेळा सलग खासदार झाला. आणि होणार नाही तर काय? इथं लोकशाही सरकार नावाची चीज अस्तित्वातच राहिली नाही. जे काही ते सबकुछ शहाबुद्दिन. आणि नावं नाही घ्यायचं कोणीच, म्हणायचं साहेब’, नाहीतर गोळ्या. राजकीय विरोधक अस्तित्वातच उरले नाहीत. ज्याने इतर कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात धरला, किंवा त्याचा संशयही आला तर मृत्यू. यापैकी एकाही निवडणूकीत त्याचे विरोधक प्रचाराला घराबाहेरही पडू शकले नाहीत. तोंडातून ब्रजरी काढला तरी काय होईल हे सांगता येत नाही. बेपत्ता झालेल्या लोकांचा तर आजतागायत पत्ताही लागला नाही.

विरोधकच न ठेवण्याची शहाबुद्दिनी पद्धत अशीच आहे.

२००४ची लोकसभा निवडणूक शहाबुद्दिननं तुरूंगातून लढवली. विरोधात होते. जद(यु)चे ओम प्रकाश यादव.(हे यादव आता सिवानचे खासदार आहेत आणि २००९ च्या निवडणूकीत शहाबुद्दिनच्या पत्नीला हरवून निवडून आलेत.) शहाबुद्दिन निवडून आला, यात अनपेक्षित काहीच नाही. पण दुपारी निकाल हातात आला आणि यादवांच्या घरावर फ़ायरिंग सुरु झालं. कारण होतं १९९९ च्या तुलनेत त्यांची मतं २३ टक्क्यांनी वाढली होती, ’साहेबच्या सिवानमध्ये त्यांना २ लाख मतं मिळाली होती. आत्ताच्या २०१० च्या निवडणूकीत सिवानशेजारच्या जिरादेई विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून


उभ्या आहेत आशा पाठक. त्यांना विचारा इथे विरोधाचं फ़ळ काय असतं. त्यांच्या मुलानं घराबाहेर पक्षाचा झेंडा लावला म्हणून त्यांच्या मुलासह तिघांची रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या घराबाहेर हत्या करण्यात आली. बाई मात्र खमकी, त्या बलिदानांना जागून या निवडणूकीला उभी आहे.पटत नाही. किंवा मन पटवूनच घेत नाही की असं काही खरंच घडत असतं आपण राहतोय त्या देशात.

मग पोलिस काय करत होते? पोलिसी स्वाभिमानावर तो अत्याच्यार होता. कलेक्टर, एस पी चालले की त्यांना कोणीही पोलिस सलाम करत नसे. इथे सलाम फ़क्त शहाबुद्दिनला. इथल्या दुकानांत गांधींचा नाही तर फ़क्त शहाबुद्दिनचाच फ़ोटो हवा हा फ़तवा काढलेला. सरकार, न्याययंत्रणा, पोलिस यंत्रणा फ़ाट्यावर मारून याच्या प्रतापपूरच्या हवेलीत अदालतभरायची. स्वत:ची बदली करून घ्यायची असेल तर याच्या दरबारात हजर व्हायला लागायचं.

पोलिसांची काय किंमत केली जायची ही २००१ च्या एका हादरवून सोडणा-या घटनेनं समजतं. मनोज कुमार पप्पू हा राजदचा एक विभागप्रमुख आणि शहापुद्दिनचा एक पाळलेला गुंड. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या संजीव कुमार या आय पी एस अधिका-याला शहाबुद्दिनने थोबाडीत मारली आणि बरोबरच्या पोलिसांना मारून मारून पळवून लावलं. मग चवताळलेल्या पोलिसांनी पूर्ण ताकतीनिशी शहाबुद्दिनच्या प्रतापपूर हवेलीवर हल्लाबोल केला. पण शहाबुद्दिन गॆंगकडे असणा-या अत्याधुनिक शस्त्रांपुढे पोलिसांचं काही चालेला. तीन पोलिस शहिद झाले. उत्तर प्रदेश पोलिसांची एक पथक बोलवावं लागलं. पण हे भारत-पाक सीमेवर घडावं तसं भयानकं युद्ध सिवानमध्ये घडूनसुद्धा शहाबुद्दिन आणि मनोज कुमारला अटक होऊ शकली नाही.
 

सरकारी यंत्रणेमध्ये जी दहशत होती तिच रस्त्यावरही होती. ’शब्बूचे शूटर्सम्हणजे यानं पाळलेले गुंडं हातात AK-47 घेऊन चौकाचौकात फ़िरत असायचे. याच्या गॆंगचे वेगवेगळे विभाग होते. म्हणजे, हत्या करणारे, अपहरण करणारे, खंडणी गोळा करणारे, रस्त्यात गाठून कपडे फ़ाडून अंगावर चिखल टाकून बेईज्जत करणारे. या पाळीव गुंडांचा हैदोस पंधरा वर्षं सिवानमध्ये बेलगाम चालला होता.

अशा स्थितीत पत्रकारिता करायची तरी काय? अगोदर सांगायला तयार होत नाहीत, पण मग एक पत्रकार हळूच सांगतो, "अगर वैसी कोई खबर हो तो उनके पास पहले कॊपी जाती थी और फ़िर ओके होने के बाद छपने के लिए जाती थी...". या परिस्थितीत जगणं हेच कौतुकास्पद.

आज सिवानमध्ये या दहशतीच्या खुणा पदोपदी पहायला मिळतात. तरीही लोक मुक्त आहेत. शहाबुद्दिनचं नाव जाहिरपणे घेतलं जातयं. दुकानांतून त्याचे फ़ोटो गायब आहेत. बंदूका घेतलेले मग्रूर गुंड दिसत नाहीत. पण त्याच्या विषयी खुलून बोलायला अजूनही घाबरतात. नाव काढलं तर एखाद दुसरं वाक्य बोलून विषय बदलतात किंवा संपवतात. पण तरीही जरा खोदलं की काही जण बिनधास्त बोलतात. बस समझिये अब सब बेहतर हाल है...आप पत्रकार है ऎसा मुंबई से आकर यहां बोल सकते है और हम आपसे बाते कर रहें है इसी मे समझ लिजिये...वरना उस वक्त हम आपको चाय पिने के लिए भी नही पूंछ सकते थे..." जिरादेईच्या भाजपाकार्यालयातला एक कार्यकर्ता म्हणतो. घर से बाहर निकले तो पता नही था की वापस घर आऊंगा या नही. गाडी पर जा रहां हूं तो रास्ते मे ही रूकवाकर बोलते थे की गाडी छोडो और निकल पडो....अगर किसीने पूंछा क्यों तो जान से हाथ धो बैठा..." दरौंदातला एका निवृत्त शाळामास्तर सांगतो. तो आता शहाबुद्दिनविषयी उघड उघड बोलायला घाबरत नाही.यह जो बाहर सभी अन्य प्रत्याशीयों का प्रचार चल रहा है ना जोर शोर से, उसी मे समझ लिजिएगा की अब एक पर्सेंट भी नही बचा उस वक्त का..." हे सांगताना त्या पत्रकाराच्या आवाजात निर्भयता आहे.

पण हे कसं बदललं? हाडापर्यंत उतरलेली भीती अशी सहज संपून जाते का?

२००५ नंतर बिहारमध्ये सत्ताबदल झाला आणि या राज्यात माजलेल्या सा-याच बाहुबलींची राजकीय रसद तुटली. ज्यासाठी लोकांनी नितीश कुमारांच्या हातामध्ये सत्ता दिली त्याला नितीश जागले. शहाबुद्दिनचा पाडाव सुरु झाला. त्याअगोदर बिहारमध्ये काही काळ राष्ट्रपती राजवत असतांना एप्रिल २००५ मध्ये शहाबुद्दिनच्या प्रतापपूर हवेलीवर तत्कालिन एस पी रत्न संजय यांनी छापा टाकला. या छाप्यात त्यांना AK-47 वगैरे मिळाल्याच पण लेझर गाईडेड गन्स, नाईट व्हिजन गॊगल्स सारखी फ़क्त सैन्याकडेच असलेली उपकरणंही सापडली. त्याचा संबंध थेट पाकिस्तानात आय एस आय शी जोडला गेला. रत्न संजय यांची बदली झालीच पण सुप्रीम कोर्टाने शहाबुद्दिनचा जामीन अर्ज फ़ेटाळला आणि तो तुरूंगात गेला तो आजपर्यंत. नितीश कुमार सरकारने मग तुरूंगातच त्याच्यावर स्पीडी ट्रायल कोर्ट्स सुरू केले. हत्या करण्यापासून ते शस्त्रास्त्रांचे अवैध साठे करण्यापर्यंत त्याच्यावर खटले गुदरले गेले. आजपर्यंत त्याच्यावर असे ३४ खटले चालू आहेत आणि संख्या अजूनही वाढत जाईल. शहाबुद्दिनच्या साम्राज्याला बूच बसलं.

पण इथवर थांबून चालणार नव्हतं. पंधरा वर्षांची ही दहशत, हा खौफ़ असा एका अटकेनं इथल्या लोकांच्या मनातून नष्ट होणार नव्हता. पोलिसांना त्यासाठी स्वातंत्र्य दिलं गेलं आणि दे वेन्ट वाईल्ड. त्यांनी या साम्राज्यातल्या प्रत्येक मोह-याला कसं संपवलं याच्या कथा अनेक जण इकडे सांगतात, पण ऒफ़ द रेकॊर्ड. जे कोणी शहाबुद्दिनच्या गॆंगमध्ये होते त्यांना शोधून शोधून पकडण्यात आलं. बडवण्यात आलं. रस्त्यावरून लोकांसमोर फ़टके मारत धिंड काढल्या गेल्या. चौकात त्यांना उभं करून लोकांना मारायला लावलं. जे जे त्या जंगलराजमध्ये भोगलं, ती पिळवणूक, ती भिती, ती आत दाबून ठेवलेली चिड, तो खदखदणारा अंगार, ते स्वाभिमानावर होणारे बलात्कार, ते स्वत:च्या पुरूषार्थावर निर्माण झालेले प्रश्न, सगळी उद्विग्नता, राग पोलिसांचाही आणि सामान्य जनतेचाही ज्वालामुखी जागा होऊन लाव्हारसासारखा बाहेर आला. ’गंगाजलहे असं लाव्हारस असतं. शेकडो जण तुरूंगात डांबले गेले, त्यांच्यावर तितकेच खटले गुदरले गेले, जे वाचले ते प्रदेससोडून पळून गेले.

शहाबुद्दिन सध्या सिवान तुरूंगात आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगतोय हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याच्या सिद्ध झालेल्या गुन्ह्यासाठी. अगोदर मुजफ़्फ़रपूर तुरूंगात होता, अर्ज विनंत्या करून त्याच्या जिल्ह्यातल्या तुरूंगात आला. पण आता तो -याखु-यातुरूंगात आहे. त्याचे दरबार भरू शकतील अशा ऎशआरामी तुरूंगात नाही. नियम कडक आहेत, त्याला भेटायला जाणाराच पोलिसांच्या तावडीत सापडू शकतो म्हणून कोणी भेटायलाही जात नाही. तरी बातम्या असतातच. मध्ये तुरूंगात त्याच्याजवळ अनेक मोबाईल सापडले म्हणून दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं. २००९ ची निवडणूकीसाठी त्याला न्यायालयानंच अपात्र ठरवलं म्हणून आता तो एम पी साहेवनाही. त्यामुळे त्याने गेल्या लोकसभा निवडणूकीत स्वत:ची पत्नी हिना शहाबला उभं केलं. पण निर्भय झालेल्या लोकांनी तिला नाकारलं. ती आता प्रतापपूर हवेलीत त्यांचा मुलगाओसामाआणि दोन मुली तस्लीमआणि हेराहबरोबर राहते प्रसिद्धीपासून दूर.

या असल्या राक्षसप्रवृत्तीच्या माणसाची दुसरीही एक बाजू असते. चांगला शिकला सवरलेला माणूस आहे हा. राज्यशास्त्रात एम ए केलंय त्याने नंतर पी एच डी सुद्धा केली आहे.(आता ती कशी मिळवली हा संशोधनाचा विषय आहे.) पण त्याला जवळून ओळखणारे सांगतात की डॊ.शहाबुद्दिन यांच वाचन अफ़ाट आहे. तुरूंगात असले साहेबतरी लायब्ररी बाळगूनच असतात बरोबर. घरीही मोठा संग्रह आहे. त्याच्या काळात म्हणे सिवानची जितकी प्रगती झाली तितकी कधीच झाली नाही असाही एक प्रवाह आहे. आयुर्वेदिक आणि युनानी कॊलेजेस त्यानेच इथे आणली. इतर कुठेही नाही पण इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम इथे आहे. काही त्याच्या दहशतीचं असं समर्थनही करतात की डोक्टरांची फ़ी गरीबांना परवडावी म्हणून ती पन्नास रूपयांपेक्षा जास्त असणार नाही असा फ़तवही त्याने काढला होता.

शहाबुद्दिनचं पुढे काय होईल? खरंच त्याच्यावरचे सारे आरोप सिद्ध करून त्याला नितीश कुमारांचं सरकार त्याला फ़ाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवेल काय? की त्याच्या दहशतीचा राजकीय फ़ायदा बघता त्याला आपल्याकडे वळवून घेईल? पण असं जर केलं तर केवळ सिवानची नव्हे तर बिहारची जनता नितीशना वा येणा-या कोणाच्याही सरकारला माफ़ करणार नाही. का तो फ़क्त लालूंनी निर्माण केलेला घाशीराम कोतवालठरेल? आक्रमकरित्या जमीनीवर दावा सांगणारी हरिजनांच्या आधारानं विस्तारत कम्युनिस्ट पार्टीची चळवळ चिरडून उच्चवर्णीय जमीनदारांना सुखावणारा आणि त्याचवेळेस दहशतीने मतं मिळवणारा लालूंचा अल्पसंख्यक मुस्लिम उमेदवार असा हा घाशीराम शहाबुद्दिनआता अवघड जागेचं दुखणं तर बनला नाही ना?

पण असे हे शहाबुद्दिन बिहारात तयार का होतात? त्याला सोसणारी पिचलेली जनता इथे असते म्हणून? इतर सा-या राज्यांपेक्षा बिहार मागास का या प्रश्नाइतकाच हा प्रश्न गहन आहे. शेकडो वर्षांच्या कर्मठ जातिव्यवस्थेच्या उतरंडीवर ठरलेलं जमिनींच वाटप, त्यातून केवळ शेतीआधारित अर्थव्यवस्थेचं निर्माण झालेलं शोषण करणारं चक्र आणि ते बदलण्याची शक्ती कमावण्यापेक्षा सहन करण्याची प्रवृत्तीत झालेली वाढ, जिथं सहनशीलता हाच ज्या जीवनपद्धतीचा कणा मग प्रतिकार कोण आणि क्सा करणार? पूर्वीचे जमीनदार असो वा नंतर त्यांचे झालेले उच्चवर्णीय बाहुबली असो वा शहाबुद्दिन असो, राज्य करणं त्यांना सोपं जातं.

आपल्या महाराष्ट्रात हे असे शहाबुद्दिननाहीयेत असं तुम्हाला वाटतंय?


4 comments:

  1. अत्यंत वास्तवदर्शी असा हा ब्लॉग आहे मयुरेश ..!! बिहार मधील खरी परिस्थिती काय आहे हे कळायला प्रत्यक्ष तिकडे जाण्याशिवाय पर्याय नाही.....वर्णन इतके अप्रतिम आहे कि वाचतानाच अंगावर काटा आला...!!
    आणि महाराष्ट्रात तरी पोलिसांना न जुमानणारा असा बाहुबली या घडीस आहे असे वाटत नाही...

    ReplyDelete
  2. शेवटच्या प्रश्नावर आधारित भाग दोनची वाट पाहत आहे:)

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. आपण लोकशाहीत राहतो याचा पूर्ण विसर पडला हे वाचताना....
    पाकिस्तानात याहून काय वेगळी परिस्थिती असणार आहे ??

    शहाबुद्दीनच्या वाचनाबद्दल वाचून आश्चर्य वाटले .... शेरलॉक होम्स मधल्या प्रो. मोरीआर्टी ची आठवण झाली - हुशार तरीही उलट्या काळजाचा...
    कधी कधी काही गोष्टींचे ठोकताळे आपण विनाकारण बांधलेले असतात... त्यांना मग असे काही तरी वाचले कि धक्के बसतात ...क्रूरकर्मा स्टालिन कवी होता हे मागे कुठेतरी वाचले होते तेव्हा असाच "shock " बसला होता ....

    btw मयुरेश .. तुला हो माहिती मिळवताना कष्ट पडले असतील na ?? एवढी दहशत असेल तर लोक त्या माणसाविषयी बोलायला अजिबात उत्सुक नसतील ना???

    ReplyDelete