Wednesday, October 27, 2010

जिरादेई: ’साधुपुरूषां’च्या प्रदेशात

झालं असं, की चाललो होतो देवाच्या आळंदीला आणि पोहोचलो चोरांच्या !


शोधायलो गेलो राजेंद्रबाबू आणि सापडला मिस्टर नटवरलाल’!!


म्हणजे एक असतो राष्ट्रपती भवनात राहणारा पहिला बिहारी (आणि भारतीय), तर दुसरा असतो ते विकणारापहिला (आणि एकमेव) बिहारी आणि दोघेही एकाच गावचे, जिरादेईचे!!!


खरंच, बिहारमध्ये काहीही घडू शकतं. आता आलोच आहे जिरादेईजवळ (सिवानपासून फ़क्त १० किमी) तर भारताचे पहिले राष्ट्रपती असलेल्या डॊ.राजेंद्रप्रसादांच्या या गावी जायलाच हवं हे ठरवलेलं होतं. त्यांचं म्हणे इथं अजूनही सुरेख जपलेलं घर आहे, ते पहायचं होतं. पण कसं जायचं याची जरा चौकशी करायला लागलो तर प्रत्येक जण सांगायला लागला, "जा ही रहे हो तो नटवरलाल के घर जरूर हो आना...". म्हणजे? मला सुरुवातीला काही समजलंच नाही. "अरे वो नटवरलाल...दुनिया का वसी मशहूर महाठग जिसपर अमिताभ फ़्लिम बनी है...वह उसी गांव का है नं...".


मग लाईट पेटला...अरे बाप रे! तो मिस्टर नटवरलाल? ठगांच्या ठगांचा ठग? द फ़ादर ऒफ़ ऒल फ़्रॊड्स?


ज्यानं परदेशी नागरिकांना ताजमहालतीनदा विकला, ’लाल किल्लादोनदा विकला आणि सालं हेही कमी पडलं म्हणून राष्ट्रपती भवनाचाही एकदा सौदा केला तो मि.नटवरलाल?


पाच फ़ुट अंतरावर उभा राहूनही केवळ हाताची हालचाल लक्षात ठेवून जगातल्या कोणाचीही हुबेहूब सही करू शकायचा मि. नटवरलाल?


शेकडो लोकांना कोट्यावधींना गंडवून १००  हून अधिक केसेस मध्ये जो भारतातल्या ८ राज्यांच्या पोलिसांना हवा होता आणि एकूण ११३ वर्षांची शिक्षा होऊनही भारतातला कुठलाच तुरूंग ज्याला शिक्षेचा पूर्ण काळ अडकवून ठेवू शकला नाही तो मि.नटवरलाल?


एकदा संधी द्या आणि भारताला चार दिवसांत कर्जमुक्त करून दाखवतो असं सरकारला जाहिर आव्हान देणारा मि.नटवरलाल?


ज्याचा आयुष्यात दोनदा मृत्यू झाला तो मि.नटवरलाल?


ज्याचं खरं काय नी काल्पनिक काय पण ठग असूनही लिजंडबनून राहिलेला, ज्याच्या हातचलाखीवरची रेलबुकं आजही हजारोनं खपतात, तो मि. नटवरलाल?


सगळं असं खटाखट आठवायला लागलं आणि जाम एक्साईट झालो. माफ़ करा, पण राजेंद्रबाबूंपेक्षा त्याच्याविषयीच जास्त आकर्षण वाटायला लागलं. आणि त्या गावात नी परिसरातही हीच एक्साईटमेंट आहे. नटवरलाल विचारलं की लगेच हसू यायला लागतं, ठग म्हणतानाही आदर वाटायला लागतो आणि त्याला कधी पाहिलं असो वा नसो रामायणाचे असतात तसे नटवरलालच्या किश्श्यांचे संस्कार बाहेर पडायला लागतात.


त्याचं घर काही अगदी प्रॊपर जिरादेईत राजेंद्रबाबूंच्या घराजवळ नाहीये. पण इथून साधारण दीड किलोमीटरवर जिरादेईचा भाग म्हणावा अशी बरगावस्ती आहे. जरा बांधाबांधानं गेलं की आलीच लगेच. 


"नटवरलाल का घर?" आमचा प्रश्न पूर्णही होत नाही तोवर हसत हसत प्रतिशश्न येतो, "देखना है? आईये मेरे पिछे..." असं म्हणून जोगिंदर स्वत:च भराभरा पुढे चालायला लागतात.यांचं वय साधारण ५० वर्षे.


"आपने देखा है कभी नटवरलाल को?" हा प्रश्न मी या गावात भेटणा-या प्रत्येक माणसाला विचारणार होतो.


"अरे नही भाई...हम कहा देखेंगे उनको? मगर सुना बहुत है बचपन से...बताते है,यह आदमी एक कुछ भी कर सकता था...एक बार उनकी बेटी की शादी थी और यह साब पुलिस क लिए वांटेड थे...पुलिस आकर बैठ गयी थी बाहर...उअनका मानना था बेटी की शादी है तो कही न कही से तो आयेंगे ही...बात तो सही थी...नटवरलाल तो जरूर आये के लेकिन पुलिस को पता भी न चला...पूरे समारोह मे एक दिन पहले से वो औरत के कपडे पहनकर बैठ गये...किसी को जरा सी भी आशंका नही हुई...जैसे ही पुलिस राह देख कर चली गयी तब नटवरलाल सबके सामने आये और देखिये, पुलिस मुझे कभी पकड नही सकतीऎसा बोलकर वापस चले भी गये..." जोगिंदर अगदी रमून सांगत होते. कितव्यांदा हा किस्सा अशा बाहेरच्या व्यक्तीला सांगत होते कोणाच ठावूक पण सांगतांना आत गुदगुल्या होत होत्या हे नक्की.


बोलता बोलता आम्ही एका जुन्या घरापाशी आलो. पडीक घर होतं. छप्पर नव्हतंच पण विटांच्या भिंती आणि पुढचं दार शाबूत होतं. बाकी खंडहर होतं गवत माजलेलं. आम्ही मात्र अजि म्या ब्रम्ह पाहिलाअसं त्या घराकडे पाहत होतो. याच घराबाहेर पोलिस त्यांची वाट पहात होते, आणि हे बाबू आत लग्नसमारंभात होते. अमेझिंग!



"अभी कुछ साल पहले उनके एक भाई रहते तथे यहां, मगर बाद मे सिवान चले गये. लडकी का पता नही." जोगिंदर माहिती पुरवतात.


"कोई है अभी गांव मे उस वक्त का जो उनसे मिला हो?" हे तर आमचं पालुपद.


"हां. एक राजेश्वर पांडे है यहां पर. पैंसठ साल के है...वो कभी उनसे मिले हो शायद."
"चलिये फ़िर उनके पास जायेंगे." आमची चौकडी मग गल्ल्यागल्ल्यांतून पांडेच्या घरी. राजेश्वर पांडे, नटवरलाल पाहिलेला माणूस, एक नंबर!


"नही भई मैने तो कभी नही देखा उनको." पांडेंचं पहिलं वाक्य. हात्तीच्या, म्हाता-यानं सारा खेळच मोडला.


" मगर मै उनकी अंत्यसंस्कार को गया था रांची. सतानवे (१९९७) में उनके भाई के साथ, जब पहली भार उनकी मौत हुई थी..." चला, पांडे कशाला तरी साक्षीदार होते तर.


आता, या पहली बार मौतचा किस्सा लै भारी आहे. या नटवरलालाभवती ज्या अनेक दंतकथा फ़िरताहेत त्यातली एक अचाट म्हणजे हा मनुष्य एका आयुष्यात दोनदा मेला. त्यातल्या पहिल्यांदा रांचीला १९९७ मध्ये. २४ जून १९९६ ला शिक्षा भोगत असतांना त्याला कानपूर जेलमधून दिल्लीत आणलं जात होतं रेल्वेनी एम्समध्ये इलाजासाठी. त्यावेळेस व्हिलचेअरमध्ये असलेला नटवरलाल रेल्वे स्टेशनवरून फ़रार झाला, त्यावेळी पोलिसांनी त्याला शेवटचं पाहिलं. नंतर बातमी आली की रांचीमध्ये त्याचं निधन झालं आणि त्याच्या भावानं गावातल्या लोकांसहित जाऊन अंत्यसंस्कार केले. पण प्रकरण इथे संपेल तो नटवरलाल कसला? त्यानंतर १३ वर्षांनी तो अजून एकदा मेला. त्याच्या वकीलांनी कानपूर कोर्टामध्ये २००९ साली असा अर्ज दाखल केला की माझ्या अशिलाविरूद्ध असलेले सारे खटले आता थांबविण्यात यावेत कारण २५ जुलै २००९ रोजी त्यांचं निधन झालं आहे’. खरं काय नी खोटं काय, त्या वरगेलेल्या नटवरलाललाच माहिती!


जसा तो मेला किती वेळा अन कधी हे माहित नाही, तसा किती नावांनी जगला हेही माहित नाही. जरी अमरझाला मि.नटवरलाल म्हणून, अधिक तरी आयुष्यभर त्याने ५० हून अधिक नावांनी त्याने गंडवागंडवी केली. आता जन्माचंच नाव म्हणाल तर हा मूळ होता मिथिलेश कुमार श्रीवास्तवज्याचा जन्म १९१२ साली जिरादेईत झाला. पण एकदा उद्योग वाढायला लागल्यावर त्याने नटवरलाल’, ’भूखल प्रसाद’, ’राधेश्यम अग्रवालअशा अनेक नावांनी तो जगला. भारताच्या एका टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत त्याने सगळ्यांना गंडवलं. कोट्यावधींचा चुना लावला. ताजमहाल-लाल किल्ला-राष्ट्रपती भवन अनेकदा विकल्याचा किस्सा तर प्रसिद्ध आहे पण आपल्या सही करण्याच्या कौशल्याने त्याने एकदा खुद्द राजेंद्र प्रसादांना गंडवले होते. त्यांची सही हुबेहुब करून त्यांच्या खात्यातून पैसे काढले होते. अनेकदा पकडला गेला, पण कधी कोणताही तुरूंग त्याला अडकवून ठेवू शकला नाही. एकदा तर म्हणे पोलिसांच्या वेशातच सगळ्यांचे सॆल्यूटस्वीकारत तो आरामात फ़रार झाला होता.


" देखिये बाबू. एक बात मगर समझ लिजिये...वह कोई डकैत नही था..नाही गोलीबारी कर किसकी हत्या उसने की है...तेज दिमाग की उसे देन थी और उसे इस्तमाल कर वह अमीरोंको ठगता था और गरीबों मे पैसा बांटता था..." पांडे हे वाक्य जरा जरबेने बोलतात तेव्हा तो तर्क मलाही पटायला  लागतो.


पण या काळात आम्हाला ख-या, हयात असलेल्या नटवरलाल पाहिलेल्या माणसाचा शोध लागलेला असतो. जयराम पणित, वय वर्षं शंभरहून अधिक, नटवरलालचे शाळेपासूनचे सवंगडी. इतकं वय होऊनही नटवरलाल हा विषय त्यांना अजूनही पुरतो.

" वह तो स्कूल से ही उसके चिटींगसे नमूने दिखाई देते थे...वैसे वह पढा भी नही, सोलह-सत्रह साल की उम्र मे घर से निकल गये और धंडे शुरू कर दिये...मुंबई मे दुकान खुलवाई गहनों की, बाद मे गोरखपूर में भी कपडॊंकी दुकान थी...गांव हमेशा आते थे और यहां  के लडकों के दुकानों मे नौकरी देते थे...बाद मे फ़िर पता चला की पैसे कैसे मिलते थे इनको..."


हे असले शेकडो किस्से आहेत नटवरलालचे या गावांत. कोणी सांगायचं थांबत नाही. ते खरे खोटे आहेत याचा कोणी विचार करत नाहीत. पण दंतकथा बनून राहिलेल्या नटवरलालची ओळख आपल्या गावाला आहे हे त्यांना आवडतं. तो महाठग असला तरी त्यांना तो आवडतो, इतकंच काय पण त्याच्याकडे काही दैवी शक्ती असणार असं त्यांना वाटतं.


दैवी शक्ती वगैरे जाऊ दे. पण त्याच्या या कर्तबगारीचं रहस्य खुद्द नटवरलालनेच सांगितलंय. १९६८ ला जेव्हा एका गुन्ह्यात अटक करून त्याला लखनौला न्यायाधीशांसमोर हजर केलं तेव्हा तो म्हणला होता, " मी काही लोकांना फ़सवत नाही, उलट तेच लालसेपायी माझ्याकडे पैसे देतात. जोपर्यंत लालसा, हव्यास आहे तोपर्यंत नटवरलाल काही मरत नाही."!


त्याला या असल्या चांगल्या-वाईट, मानवी-दैवी असल्या विशेषणांत उगाच न अडकवता आम्ही गावाबाहेर पडतो. एक नक्की की, ’मी नटवरलालच्या घरी जाऊन आलोही सांगण्यासारखी गोष्ट आहे.


ख-या साधुपुरूषाचं, राजेंद्रबाबूंचं गांव
जिरादेईला आलो मात्र हे राजेंद्रबाबूंचं म्हणून. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॊ.राजेंद्र प्रसाद यांचे हे गाव. हे राजेंद्र प्रसादांचं जन्मस्थान. आजही त्यांच्या कुटुंबाची प्रचंड हवेली व्यवस्थित जपली गेली आहे. राजेंद्रप्रसादांचे वास्तव्य उत्तरार्धात दिल्लीत जरी असले तरीही सारे एकत्र कुटुंब इथेच असायचं जिरादेईत. बिहारच्या या भागात स्वातंत्र्यचळवळ त्यांनी रोवली या घरातून. कॊंग्रेसचंही ते एक महत्वाचं केंद्र होतं. राजेंद्रबाबूंच्या पश्चात त्यांचा एक मुलगा मृत्युंजय प्रसाद इथे असायचे. त्यांनीही इथून राजेंद्रप्रसादांचा राजकीय वारसा पुढे चालवला, ते दोन वेळा खासदारही होते. आता मात्र त्यांच्याही कुटुंबाचं इथे कोणी नाही. ते डेहरादूनला असतात. गांधीवादी असूनही बिहारच्या पंरंपरागत जमीनदारी प्रथेने हजारो एकर जमीन आपल्याकडे ठेवल्याचे आरोप त्यांच्यावर झाले ती जमीन आता जवळपास सगळीच विकून टाकली आहे.


राजेंद्रबाबूंचं आज मात्र हे घर भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. प्रचंडच आहे. खोल्यांची संख्या मोजली तरीही पसारा किती मोठा होता ते कळेल. आत एक छोटा पुतळा आहे प्रांगणातच. या घराततच महात्मा गांधींचही वास्तव्य होतं. ते रहात असलेल्या खोल्याही व्यवस्थित जपल्या आहेत. इथे जयप्रकाश नारायणांचंही वास्त्यव्य असायचं. जेपींची पत्नी प्रभावती आणि मृत्युंजय प्रसादांची पत्नी या दोघी बहीणी, त्यामुळे साडूंकडे जेपींचा मुक्काम असायचा. अगोदरच बिहारला पर्यटन वगैरे करायला येणा-यांची संख्या कमी आणि त्यात इथही त्याबद्दल फ़ार काही अप्रूप नाही, त्यामुळे भेट देणा-यांची संख्या अगदीच तुरळक. नाही म्हणायला, ही वास्तू संरक्षित असल्यानं गावाला रस्ते वगैरे करून मिळालेत चांगले.
पण राजेंद्रबाबूंची कॊग्रेस आता इथे पाण्यालाही मिळत नाही. एकेकाळी या राज्या सर्वत्र असलेल्या कॊग्रेस आता बिहारमधून कशी हद्दपार झाली आहे याचं जिरादेई हे उत्तम उदाहरण आहे. आता  ज्यांनी गांधीवाद इथे रूजवला त्या राजेंद्रबाबूंच्या गावातून शहाबुद्दिन पहिल्यांदा निवडून जातो याला काय म्हणायचे? गेल्या दोन निवडणूका इथे भाजपा आणि जद(यू)च आहे. कॊंग्रेसला इथे एकही चेहरा नाही. सध्या राहुल गांधीच्या बिहारच्या नव्या कॊंग्रेसचा एक चेहरा आहे. पण तो पहायला जरा पुढं जावं लागतं, जिरादेईशेजारच्या गोपालगंज मध्ये, साधु यादव!

साधु,साधु!


साधु यादव हे नाव आता उभ्या भारतात सर्वांना माहित आहे. प्रकाश झा च्या गंगाजलने हे नाव आणि त्याची दहशत घराघरात पोहोचवली. पण त्याच्याअगोदरही तो प्रसिद्ध होताच. राबडी देवींचा भाऊ, लालूंचा मेव्हणा म्हणून तो गोपालगंजमधून आमदार झाला, खासदार झाला. राजदच्या गुंडगिरी राजकारणाचा पक्का वारस बनला. बिहारमध्ये जरा त्याने जास्तच हातपाय पसरायला सुरुवात केली होती, म्हणून २००९ च्या लोकसभा निवडणूकीत त्याचं तिकीट लालूंनी कापलं. घरातलाच माणूस डोईजड होऊ दिला नाही. मग तो बेतिया, म्हणजे पश्चिम चंपारण्यात, इथून लढला ज्यानं त्याला गंगाजलमधून देशभर बदनाम (?) केलं त्या प्रकाश झा विरूद्ध खुन्नस म्हणून. पडला, आपटला. साधु मग कॊंग्रेसकडे वळला. त्याला गांधींची आठवण झाली. आता पुन्हा गोपालगंजमधून कॊंग्रेसच्या तिकीटावर उभा आहे विधानसभेसाठी.
आता इथं आल्यावर याही साधुपुरूषाला भेटलच पाहिजे. गोपालगंज जिरादेईपासून साधारण ३० किलोमीटर आत शिरलो शहरात तेव्हा एक गोष्ट मात्र चटकन नजरेत भरली ती म्हणजे पहिल्यांदाच बिहारमध्ये सिमेंटचे रस्ते दिसत होते. मध्यभागी मोठं आंबेडकर सभागृहहोतं हॊटेल्स दिसत होती, सायबर कॆफ़े दिसत होती. आणि जिथं जिथं विकासकामे झाली होती तिथं तिथं साधु यादवचं नाव कोरलेले फ़लक होते. त्याच्या कार्यालयात गेलो. कार्यालय कसलं, बंगलाच होता मोठा साधु यादवचाच. समजलं की तो आता इथे राहत नाही. जवळच एक अजून मोठा बंगला (हवेली!) बांधलीय नवीन. पण आता सारे कार्यकर्ते दिसत होते. कार्यकर्ते कसले, कोणीही टगे पांढरे परिटघडीचे कपडे घालून आपल्याकडेही पार्टी ऒफ़िसेस मध्ये बसतात तसे पांढरेगुंड. बाकी सगळीकडे गेलो बिहारात की पत्रकार म्हटल्यावर स्वागत व्हायचं. इथं कपाळावर आठ्या.


"कैसा है माहोल?"आपलं सुरुवात करायची म्हणून विचारलं.


"बढिया है. साधुजी का माहौल है!" सरळसोट उत्तर.


"साधुजी का या राहुलजी का?" खरं काय ते काढायचं होतं.


"उनका क्यो? अभी कल बिहारमे आये राहुलजी का ऎसा कितना असर पडेगा? यहां काम है साधुजी का. अभी लोग कुछ नही कहेंगे लेकिन वोट किस कि देंगे ये देखना." हे निरिक्षण होतं की धमकी?


पण कॊग्रेसच्याच कार्यकर्त्यानं राहुलला शालजोडीतले मारल्यावर खरं चित्र स्पष्ट झालं.यहां राहुल नही चलेगाहे साधु यादवचा माणूस किती आत्मविश्वासानं सांगत होता. मग साधु यादव स्वत: राहुलला काय मानत असेल? बेदरकारपणे गुंडगिरी करणा-या आणि एक समांतर सत्तास्थळ बनत चाललेल्या साधु यादवला कुठं थांबवायचं हे लालू प्रसादांना समजलं होतं म्हणून त्यांनी साधुचं तिकीट कापून बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण वळचणीला आलेल्या साधुला कॊंग्रेसनं मात्र लगेच पंखाखाली घेतलं होतं, लोकसभेचं तिकीट दिलं होतं. खरं तर लोकसभा निवडणूकीत कॊग्रेसचं जे पानीपत झालं त्या मुख्य कारण दुस-याला नैतिकतेचे धडे देणा-या या पक्षाने साधु यादव आणि त्याच्यासारख्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवा-या दिल्या. मग लोकांनी नाकारलं, नाकारणारच. पण राहुल गांधींची कॊंग्रेस यातून काहीही शिकली नाही. 


राजेंद्रबाबूंचे गांधी आणि साधु यादवचे गांधी वेगळे होते.


"साधुजी से मिलना है...कहां मिल सकते है?" आम्ही विचारलं.


"कैसे मिलेंगे? वह तो क्षेत्र मे है. नही मिल सकते. सुबह छ्ह बजे निकलते है और रात बारह बजे तक आते है." त्या कार्यकर्त्यानं फ़टकारलंच.


"कहां है मगर? हम जाकर वही मिल लेंगे उनसे." मी म्हटलं. आम्ही याअगोदरही अनेक उमेदवारांना असं कुठल्या तरी खेड्यातच पकडलं होतं.


"नही बाबू. वह देहात मे होंगे. आप नही पहुंच सकते वहां."


"मगर उन्हे फोन तो लगाकर देखिये की लोकेशन क्या है?" मी हट्टालाच पेटलो होतो.


"वह तो मोबाईल नहीं रखते अपने पास." एक नंबर, ’साधु यादव मोबाईल वापरत नाहीहीच खरी बातमी आहे.


अर्थ समजला. याला आपल्याला भेटू दिलं जाणार नाही. जर जिंकलाच तर भेटेल आणि ती शक्यता कमीच आहे. त्याच्या गुंडगिरीच्या नाड्या पार आवळल्या गेल्यात. राजकारणात खरा बाप दाखवला नाही तर कसं श्राद्ध घालावं लागतं हे त्याला लालूंनी दाखवून दिलंय. जरा हातपाय हालवले की निवडणूक आयोग कारवाई करतोय. गेलो त्याच्या आदल्या दिवशी गोपालगंजमध्ये त्याच्या सात गाड्या पकडून साधु यादव वर गुन्हा दाखल केला गेला होता. लोकांच्या कुजबुजीतनं समजलं की फ़ार बाहेर न पडता, पेपरमधून मोठमोठ्या जाहिराती देत साहेब मतदानाच्या दिवसाची वाट पाहत होते.


"भाई वह माहौल नही रहा. साधु को देखा? पहले कैसे दाढी बढाकर गुंडो के साथ घुमा करता था. अब दाढी हटाकर सज्जन बन बैठा है!" चहाच्या टपरीवरच्या गप्पा कान देऊन ऎकाव्या लागतात.


शेवटी, या साधुपुरूषांच्या प्रदेशात येऊनही त्यापैकी एकाशीही भेट झाली नाही. एक हयातच नाहीत. दुसरा हयात आहे वा नाही हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. आणि तिसरा साधु हयात असून गुहेत आहे, बाहेर पडत नाही.


निघालो, कारण चंपारण्याची वाट धरायची होती.

------------------------

2 comments:

  1. sahi re...chan vatla vachun. Natwarlal chya gavala jaun aalas, aata bhetlo ki detail gappa maru.

    ReplyDelete
  2. mast re mayrya, Bihar Uncut Live Report chan vatla

    ReplyDelete